Welcome to Yodha News   Click to listen highlighted text! Welcome to Yodha News
महाराष्ट्र

हिवरगाव टोल नाक्यावर वादांचे कारण काय?

नियम, पास व्यवस्था आणि गैरसमजांमुळे तणाव ...

संगमनेर 

दि. १६ फेब्रुवारी २०२६

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव टोल नाक्यावर वाहनचालक व कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार होणाऱ्या वादांबाबत सध्या विविध चर्चा सुरू आहेत. या वादांमागील कारणांचा अभ्यास केला असता अनेक गैरसमज व माहितीच्या अभावामुळे हे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक वाहन क्रमांक असलेल्या, विशेषतः एमएच सतराच्या (MH 17) किंवा संगमनेर परिसरातील वाहनांना बहुतांश वेळा कोणतीही अडचण येत नसल्याचा अनुभव अनेक नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र, सेकंड हॅण्ड किंवा दुसऱ्या गावातील नंबर प्लेट असलेल्या वाहनांना टोल नाक्यावर अडवले जाते. याच कारणामुळे अनेक वेळा वाद निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

काही वाहनचालक स्थानिक असल्याचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड दाखवूनही सूट न मिळाल्याने नाराजी व्यक्त करतात. मात्र, टोल कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून ठराविक सूचना दिलेल्या असल्यामुळे ते नियमांनुसारच कार्य करतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करण्यात आली असून, ते नागरिकांशी संवाद साधण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच काही कर्मचारीही स्थानिक ग्रुपशी जोडले गेले असून, समन्वय वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नागरिकांनी दरमहा दोनशे रुपयांचा पास काढून घेतल्यास अशा वादांना आळा बसू शकतो, असेही सुचवण्यात आले आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन गैरसमज टाळता येतील, असे मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, या विषयावर नागरिकांच्या भावना तीव्र असून, याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदारांनी लक्ष देण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त करण्यात येत आहे. टोल नाक्यावर पारदर्शक व्यवस्था व सुस्पष्ट नियम लागू झाल्यास भविष्यातील वाद कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिक व कर्मचारी दोघांनीही परस्पर समजूतदारपणा दाखवल्यास हे प्रश्न सुकरपणे सुटू शकतात, असे मत विविध स्तरांतून व्यक्त केले जात आहे.

 

____________________

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!